आंबा महोत्सवातील अस्सल हापूस आंब्याची चव चाखावी : सुभाष देशमुख

पोलीसनामा ऑनलाईन 
पुणे : बालगंधर्व रंगमंदिर परिसर येथे आयोजित आंबा महोत्सवातील नैसर्गिकरित्या पिकविलेल्या अस्सल देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याची ग्राहकांनी खरेदी करुन या आंब्याची चव चाखावी, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, जिल्हा उपनिबंधक बी.टी.लावंड, मुख्य व्यवस्थापक डी.डी.शिंदे,व्यवस्थापक जे.जे.जाधव आदि उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी बालगधर्व रंगमंदिर परिसरातील आंब्यांच्या स्टॉल्सला भेटी देत आंबा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला.

सहकार मंत्री देशमुख म्हणाले, कृषी व पणन मंडळातर्फे कोकणातील उत्पादक शेतकऱ्यांना स्टॉल्सची उभारणी करण्याकरीता जागा उपलब्ध करुन दिली आहे. या कोकणातील उत्पादक शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या अस्सल आंब्यांची ग्राहकांनी अधिकाधिक खरेदी करावी. पुणे शहरात एप्रिल व मे महिन्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर परिसरासोबतच मार्केट यार्ड, औंध, पिंपरी चौक, चिंचवड येथील चापेकर चौक आणि निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथेही हा आंबा महोत्सव भरवण्यात येत आहे. या महोत्सवांचाही लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.

यावेळी पणन मंडळाचे अधिकारी, कर्मचारी व उत्पादक शेतकरी उपस्थित होते.