आधार यशस्वी होऊ नये ही गुगलची इच्छा: केंद्र सरकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गुगल आणि स्मार्ट कार्ड हे आधारमुळे व्यवसायाबाहेर पडतील, या भीतीने त्यांनी आधारबाबत अपप्रचार सुरू केल्याचे यूआयडीएआयने (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया) म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर मंगळवारी यूआयडीएआयने आधार कार्ड संबंधित प्रकरणावर हा आरोप केला. आधार हे ओळख पटवण्यासाठी एक सुलभ माध्यम म्हणून समोर येत असल्यामुळे गुगल आणि स्मार्ट कार्ड लॉबी आधारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यूआयडीएआयने केला.

आधारची माहिती सुरक्षित आहे किंवा नाही याबाबत न्यायालयाने शंका व्यक्त केली आहे. यावर यूआयडीएआयचे वरिष्ठ अधिवक्ता राकेश द्विवेदी यांनी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाला सांगितले की,आधार कार्डचा वापर स्मार्ट कार्डप्रमाणे केला जाऊ नये म्हणून युरोपमधील एका व्यावसायिक कंपनीने अभियान सुरू केले आहे. जर आधार यशस्वी झाले तर स्मार्ट कार्ड व्यवसायातून बाहेर होईल. त्यामुळे गुगल आणि स्मार्ट कार्ड लॉबीला आधार यशस्वी करायचे नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून आधारवर आरोप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठातील न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी आधारसाठी जी माहिती घेण्यात आली आहे. तिच्यामुळे निवडणूक प्रभावित होऊ शकते का, अशी शंका उपस्थित केली. न्यायालयाने म्हटले की, आधारचा डेटा लीक झाल्यामुळे निवडणूकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आधारचा डेटा सुरक्षित आहे किंवा नाही हे सांगणे कठीण आहे. कारण भारतात डेटा सुरक्षेबाबत कोणतेच कायदे अस्तित्वात नाही.

यावर द्विवेदी म्हणाले,”बायोमेट्रिक डेटा कोणाबरोबरही शेअर केला जात नाही. ज्याचे आधार आहे, त्याच्या सहमतीशिवाय ही माहिती दिली जाऊ शकत नाही. डेटा लीक होणार नाही यासाठी पुरेपूर प्रयत्न आम्ही करत आहोत. पण याची 100 टक्के खात्री देता येणार नाही. परंतु, याला फेसबुक लीक प्रकरणाशी जोडले जाऊ नये.,”