ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाची अट ६० वर्षे करण्याचा निर्णय दोन महिन्यात : दिलीप कांबळे

मुंबई : पोलीसनामा अॉनलाईन
ज्येष्ठ नागरिक म्हणून वयाची अट ६५ वरुन ६० वर्षे करण्याबाबतचा निर्णय येत्या दोन महिन्याच्या आत घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

कांबळे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी महानगरपालिका क्षेत्रात ज्या जागा ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी आरक्षित ठेवल्या आहेत त्या तशाच ठेवण्याबाबत तसेच या जागा वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. मातोश्री वृद्धाश्रम योजनेअंतर्गत ज्या संस्थांचे अनुदान बंद झाले त्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने कोल्हापूरच्या धर्तीवर आजारी ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सुरु करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतनीस देणाऱ्या संस्थेने अशा मदतनीसांची पूर्ण चौकशी करुनच त्यांना पाठवावे, असे संबंधित संस्थेला निर्देश देण्यात येतील. असे न केल्यास व मदतनीसांकडून काही गुन्हा घडल्यास संबंधित संस्थेला सहआरोपी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.