‘तावडें’च्या तावडीतून शाळा सुटल्या

मुंबई:पोलिसनामा ऑनलाईन
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. चहूबाजूच्या टीकेनंतर तावडेंनी विधीमंडळात याबाबतची घोषणा केली. “30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. अधिकाऱ्यांना बोलवून त्याबाबतची सूचना देऊ”, असं तावडे म्हणाले.
तसंच शिक्षण विभागाने केंद्र सरकारच्या निर्देशानेच हा निर्णय घेतला होता. पण सध्या तो मागे घेण्यात येत असून, आवश्यकता भासली तर पुढील शैक्षणिक वर्षात तो लागू करु, असं तावडेंनी सांगितले.

शाळा सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय काय होता?
राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 1 मे नंतरच उन्हाळी सुट्टी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयामुळे मार्च – एप्रिलमध्ये जरी वार्षिक परीक्षा संपली, तरी त्यांना 30 एप्रिलपर्यंत शाळेत जावे लागणार होते.

याकाळात शाळांमध्ये उन्हाळी शिबिरे, विविध उपक्रम राबवण्यात येणार होते. सरकारने तसे आदेश शाळांना दिले होते. मात्र ते आता मागे घेण्यात आले आहेत.