देशातील 62 विद्यापीठांना स्वायत्त दर्जा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संपूर्ण देशातील एकूण 62 विद्यापीठ आणि संस्थांना आज (मंगळवार) स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचाही समावेश आहे. केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे आणि महाविद्यालये अशी विभागणी करण्यात आली.

स्वायत्ता देण्यात आलेल्या विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठाचा समावेश आहे. श्रेणी : १ स्वायत्तता महाविद्यालये गटातून महाराष्ट्रातील काही संस्था आणि महाविद्यालयांचाही समावेश आहे. स्वायत्त दर्जा मिळालेल्या विद्यापीठे आणि महाविद्यालयांना आता अभ्यासक्रम, प्रवेश प्रकिया, फी यासारखे अनेक निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचे अधिकार प्राप्त होणार आहे.

उच्च शैक्षणिक दर्जा राखल्याच्या निकषावर ६२ संस्थांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ६२ स्वायत्त शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली. ज्यात ५ केंद्रीय विद्यापीठे, २१ राज्य विद्यापीठे, २६ खासगी विद्यापीठे आणि १० महाविद्यालयांचा समावेश आहे.

श्रेणी :१ स्वायत्तता महाविद्यालये या प्रकारात महाराष्ट्रातून काही इतर नावेही आहेत.
– टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई
– होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई
– नरसी मुंजी इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज
– डॉ.डी वाय पाटील विद्यापीठ पुणे
– सिम्बॉयसिस इंटरनॅशनल, पुणे
– इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई
– दत्ता मेघे मेडीकल इन्स्टिट्यूट, वर्धा
– डी.वाय पाटील विद्यापीठ, नवी मुंबई

स्वायत्त दर्जा मिळाल्याने काय होईल?
ज्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा मिळाला, त्यांना विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीच्या परवानगीशिवाय मोठे निर्णय घेता येणार आहेत. स्वायत्त दर्जा मिळालेल्या विद्यापीठांवर यूजीसीचेच नियंत्रण असेल. मात्र त्यांना नवा अभ्यासक्रम, नवा कोर्स, नवा विभाग सुरु करण्यासाठी यूजीसीच्या परवानगीची गरज नसेल.
या विद्यापीठांना कार्यक्षेत्राबाहेर विविध अभ्यास केंद्र, रिसर्च पार्क, परदेशी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश आणि परदेशी तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्तीही करता येईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही विद्यापीठे तज्ज्ञ शिक्षकांना आकर्षित करण्यासाठी सातव्या वेतन आयोगापेक्षाही जास्त पगार देऊ शकतील.
ही विद्यापीठं जगभरातील विद्यापीठांशी शैक्षणिक करार करु शकतात. यूजीसीने विद्यापीठांशिवाय आठ महाविद्यालयांनाही स्वायत्त दर्जा दिला आहे. ही महाविद्यालये स्वत:चा अभ्यासक्रम बनवू शकतील, स्वत: परीक्षा घेऊन निकाल जाहीर करु शकतील.