प्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियकराने केला पत्नीचा खून

सातारा : पोलीसनामा आॅनलाईन
वाई तालुक्यातील मांढरदेव येथे तीन दिवसापूर्वी घाटात एका महिलेचा गळा चिरुन खून करण्यात आला होता. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियकराने तिचा घात केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मांढरदेव घाटामध्ये खून झालेल्या महिलेची अोळख पटल्यानंतर ही खळबळजनक माहिती समोर आली आहे.

बानू कोकरे (वय २३, रा. भिवंडी, मुंबई) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तीन दिवसांपूर्वी वाई तालुक्यातील मांढरदेव घाटात तिचा खून करण्यात आला होता. महिलेच्या हातावर केवळ बानू असे गोंधले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असता,वाई परिसरातील सर्व हॉटेल आणि लॉजमध्ये जाऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले होते.

तपासा दरम्यान मृत महिलेसोबत आणखी एकजण असल्याचे फुटेजमध्ये दिसले. त्यानंतर त्या महिलेचा पत्ता लॉजमधून घेऊन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. समाज माध्यमांवर बानूचा फोटो व्हायरल झाल्यानंतर एका व्यक्तीने पोलिसांना आरोपीबाबत माहिती दिली असता, प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी सातारा पोलीस मुंबई (भिवंडी) या ठिकणी पोहचले. पोलिसांनी आरोपीला घरातून अटक करुन साताऱ्यात आणण्यात आल्यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच त्याने प्रेम विवाह केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खून केल्याची कबुली दिली आहे. मात्र आरोपीने नेमका खून कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप सांगितले नाही.
या प्रकरणाचा सातारा पोलीस पुढील तपास करत आहेत.