फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘…तर आम्ही अभिनंदन करू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. संजय राठोड, अनिल देशमुख या मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील सरकार अस्थिर करणार असल्याची विधाने भाजपकडून सातत्याने केली जात होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताबदलाचे वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. ‘सरकार पाडल्यानंतर आम्ही तुमचे अभिनंदन करू’ असे त्यांनी म्हटले.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात दाखल झाले आहेत. तेथे आयोजित एका सभेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. सरकार पाडण्याचे माझ्यावर सोडा, असे त्यांनी म्हटले होते. या वक्तव्याचा समाचार घेत संजय राऊत म्हणाले, ‘सत्ता बदलाबाबत पंढरपूरात जाऊन विधान केल्यामुळे प्रत्यक्ष विठोबा-माऊलीसुद्धा अत्यंत सावध झाली असेल. मात्र, विठु-माऊलीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. विरोधी पक्षाला अशी भाषणे करावीच लागतात. यापूर्वी आम्हीही अशी भाषणे केलेली आहेत. त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी, लोकांमध्ये उत्साह आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस तसे भाषण करत असतील.

दरम्यान, या काळात सरकार पडणार, सरकार पाडणार, सरकार अस्थिर करणार हे जेव्हा पाडतील तेव्हा त्यांचे अभिनंदन करू, असे संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते फडणवीस?
एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार? त्याने काय सरकार बदलणार का? असे अनेकांना वाटत असेल. पण सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.