शरद पवार मामाच्या गावाला

पोलिसनामा ऑनलाईन : शिल्पा माजगावकर

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज आपल्या मामाच्या गावाला म्हणजेच आपल्या आजोळी गेले आहेत. त्यांचे आजोळ आहे तरी कुठे, आणि त्यांचे स्वागत झाले तरी कसे ? जाणून घेऊ…. प्रत्येक अंगणात रांगोळ्या … घराघरांवर गुढ्या… रस्त्यात फुलांचा सडा… आणि झंझपथक… ही स्वागताची तयारी आहे देशाचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासाठी.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे हे गाव म्हणजे शरद पवार यांचे आजोळ. शरद पवार यांच्या आई शारदाबाई यांचे हे गाव जेमतेम अडीच ते तीन हजार लोक वस्ती, मात्र या गावचा संबंध शरद पवार यांच्याशी असल्याने या गावातल्या प्रत्येक ग्रामस्थला अभिमान आहे. आज शरद पवार यांचे गोलिवडे गावात आगमन होताच झांज पथकाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील महिलांनी त्यांचं औक्षण केलं, आणि ते व्यासपीठावर आले. हिरव्या साड्या परिधान केलेल्या महिला आणि फेटे घातलेले गावकरी शरद पवारांकडे डोळे भरून पाहत होते. गावाच्या वतीने शरद पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना शरद पवार हे भारावून गेले होते. गोलिवडे गावाचा आपल्या आईचा ऋणानुबंध सांगत गावाशी असलेले नातेसंबंध स्पष्ट केले. तसेच आपल्या आईच्या अनेक आठवणींना पवारांनी उजाळा ही दिला.

शरद पवार त्यांच्या आठवणी सांगत असताना म्हणाले ,”खरंतर लग्नसाठी मामाच्या गावाची पोरगी करतात अशी पद्धत आहे . पण माझ्या नशिबात हा योग नाही.. परंतु मामाच्या गावाला यायला खूप उशीर झालाय आणि आता ते शक्यही नाही” असे म्हणताच एकच हशा पिकाला.

गोलिवडे गावात यंदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यातच महिला सरपंचाची निवड देखील बिनविरोध करण्यात आली आहे. खरंतर या ग्रामपंचायतीचा आदर्श राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने घेतला पाहिजे. तसंच जिथं महिलेच्या हातात कारभार असतो तिथला कारभार नेहमीच नीट होतो, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. तसंच समाज समृद्धी च्या स्तरावर न्यायायचा असेल तर घरातील प्रत्येक स्त्री ही शिकली पाहिजे असं शरद पवारांनी म्हटलं आहे . कर्तृत्वाचा मक्ता हा पुरुषांबरोबर महिलेकडे असतो हे विसरून चालणार नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. आपल्या गावाचा नातू हा देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचावा आणि ते लवकरात लवकर पंतप्रधान व्हावे म्हणून गोलिवडे ग्रामस्थांनी ग्रामदेवतेला साकडं घातलं आहे. तसंच शरद पवार यांच्या भेटीने गावचं नाव जगाच्या नकाशावर आल्याची भावना व्यक्त केली.