सूर्य कोपला ; गेल्या ४८ तासांत उष्माघाताने १० जणांचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपुरात गेल्या ४८ तासांत दहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी नागपूरमध्ये ४७. ५ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. नागपुरात एप्रिल महिन्याअखेरीसच तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे तेव्हापासूनच उष्माघाताच्या बळींना सुरुवात झाली. गेल्या दोन आठवड्यात किमान २५ अनोळखी व्यक्तींचे मृतदेह रस्त्यावर आढळले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात दहा विविध ठिकाणी अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळले. या सर्वांचा मृत्यू उष्माघातानेच झाला असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केअर हॉस्पिटल समोरील शहीद उड्डाण पुलाखाली, गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॉटन मार्केट येथे, सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रयास ॲकॅडमीच्या प्रवेशद्वाराच्या बाजूच्या पॅसेजमध्ये, रामझुल्याखाली तसेच अशोक चौकातील फुटपाथवर, कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एम्पायर ट्रान्सपोर्ट कॅरियर दुकानाच्या पायरीवर, सक्करदरा उडाणपुलाखाली, हनुमान मंदिर परिसरातील भोसले जिमसमोर, मोठा ताजबागेतील बुलंद गेटसमोर, सिव्हिल लाइन्स परिसरातील आयजी ऑफिसच्या कुंपणाजवळील फुटपाथवर अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत.

गेल्या आठवडाभरापासून उष्णतेची लाट तीव्र होत असून विदर्भ होरपळून निघत आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भात तापमान ४७ अंशाच्या पुढे नोंदविण्यात आले. तापमानाने मंगळवारी नागपूरमध्ये ४७. ५ अंश से. टप्पा गाठला असून गेल्या ११ वर्षांतील हे सर्वाधिक तापमान आहे. उष्णतेची ही तीव्र लाट पुढील दोन राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.