मुंबईत कारशेडच्या आगीत १०० हून अधिक कार भस्मसात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वसईतील टॅब कॅब कंपनीच्या कारशेडला लागलेल्या आगीत तब्बल १०० गाड्या जळून भस्मसात झाल्या आहेत. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

वसई पूर्वला ससूननगरमधील मालाजी पाडा भागात हे कारशेड आहे. या कारशेडला शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास आग लागली. याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणली. आगीचे कारण मात्र अद्याप कळलेले नाही. कारशेडच्या सुरक्षेसाठी कुणीही नव्हते. तसेच कारशेडमधील अनेक गाड्या या अतिशय वाईट स्थितीत होत्या. आगीत जळालेल्या सर्व कार या टॅब कॅब कंपनीच्या आहेत. कारशेडमध्ये नादुरुस्त झालेल्या गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. हे कारशेड वसईत मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत एका खुल्या जागेवर आहे.

याआधी विरारमध्ये १७ जानेवारीला अशीच आग लागली होती. विरार पूर्वतील काणेर पोलीस चौकीच्या मागे जप्त केलेल्या गाड्यांना आग लागली होती. यात अनेक गाड्या जळून भस्मसात झाल्या होत्या.