मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा ! 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्याबाबत मोहीम राबविणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यातील १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एक घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा, शैक्षणिक वर्ष लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षात नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. तर परीक्षा सुरक्षितपणे घेण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन समान स्तरावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्याबाबत मोहीम राज्यात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी चर्नी येथील बालभवन येथे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परिक्षांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासह अधिकारी, शिक्षक उपस्थित होते. त्यावेळी मंत्री गायकवाड म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे योग्य आहे. यासाठी शिक्षक प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावे. सर्वांनी एकत्र येऊन शासनासोबत ही मोहीम यशस्वीपणे राबवून विद्यार्थ्यांची सकारात्मक मानसिकता तयार करण्यासाठी सहकार्य करावे.

पुढे त्या म्हणाल्या, परिक्षेच्या पूर्वतयारीस अवधी मिळावा या सगळ्या गोष्टींचा विचार करून परिक्षेचे वेळापत्रक तयार केले आहे. वेळापत्रकाबाबत आणखी काही सुचना असतील तर त्या सादर कराव्यात. त्यासंदर्भात सल्लागार समितीशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. प्रॅक्टीकल परीक्षा, जनरल सादर करण्यासंदर्भात राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एकसारखा निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर विद्यार्थ्यांना सामान्यत: पडणाऱ्या प्रश्नांबाबत वेबसाईटवर ‘एफएक्यु’ (FAQ) देण्यात येणार आहे. ज्या रहिवासी शाळा बंद आहेत, त्या शाळेतील केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि परीक्षा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.