दुर्दैवी ! कोरोनाच्या संकटात ट्रॅक्टरवर वीजेची तार कोसळून 13 जणांचा मृत्यु, 11 महिलांचा समावेश

अमरावती : आंध प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील माचावरम येथे ट्रॅक्टरवर वीजेची तार कोसळल्याने त्यात वीजेचा धक्का बसून १३ जण ठार झाले. त्यात ११ महिला शेतमजूरांचा समावेश आहे. प्रकाशम जिल्ह्यातील माचावरम येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. मिरचीच्या शेतात काम करणारे सुमारे ३० शेतमजूर सायंकाळनंतर काम संपवून आपल्या जवळच्या शेतात ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून जात होते.

गावात जात असताना ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टरने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडक दिली. त्यामुळे विद्युत प्रवाह सुरु असलेल्या या खांबावरील विजेची तार तुटून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर पडली. त्यात ट्रॉलीमध्ये बसलेले शेतमजूर अक्षरश जागेवरच भाजून ठार झाले. ट्रॅक्टरचालक व त्याचा मदतनीस हे जखमी झाले आहेत. घटनास्थळी १३ जणांचा जागीच मृत्यु झाला. त्यात ११ महिला शेतमजूरांचा समावेश आहे.

या अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश दिले आहेत.