धक्कादायक… पाणीबाणीची बळी ! पाणी भरताना ५० फूट खोल विहिरीत पडून १३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – धुळ्यात पाणीटंचाईने एका १३ वर्षीय चिमुकलीचा बळी घेतला आहे. तालुक्यातील मोरदड तांडा येथे एका खासगी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय चिमूरडी विहिरीतून पाणी काढताना तिचा पाय घसरून ती ५० फुट खोल विहिरीत तोल गेल्याने पडली. त्यात गंभीर जखमी झाल्याने तिचा जागेवर मृत्यू झाला.

नंदिनी नथु पवार (वय १३) असे मृत मुलीचे नाव आहे.

तालुक्यातील मोरदड तांडा गाव २२०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावात मागील ३ ते ४ वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळ आहे. प्रशासनाकडे मागणी करूनही फक्त २ टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दरम्यान नंदिनी गावातील एका खासगी विहीरीतून पाणी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाणी काढताना तिचा तोल गेला आणि ५० फुट खोल विहिरीत पडून तिचा जागीच मृत्यू झाला.