Coronavirus : कोल्हापुरमध्ये आणखी 16 तबलिगी आढळल्यानं खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘तबलिगी जमात’साठी गेलेल्या आणखी 16 लोकांचा शोध कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यांना पन्हाळा तालुक्यात संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. दरम्यान नव्याने सापडलेल्या या तबलिगींमुळे कोल्हापूर जिल्ह्यातून नेमके किती लोक मरकजसाठी गेले होते यावरून पोलीस आणि प्रशासनापासून सगळेच बुचकळयाच पडले आहेत. या लोकांचा जिल्ह्यात मोठया प्रमाणात शोध सुरू केला आहे. तर ही संख्या अजून स्पष्ट न झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

निजामुद्दीन येथील मरकजसाठी चाळीसहून अधिक लोक गेले असल्याची माहिती देण्यात आली. यातील दिल्ली येथे 21 तर जिल्ह्यात 10 आणि अन्यत्र 9 जणांचे विलगीकरण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने गुरुवाकी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज आणखी आणखी 16 तबलिगींचा शोध लागल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शाहूवाडी तालुक्यात हे सर्व जण सापडले असून हे सर्वजण 16 मार्च दरम्यान जिल्ह्यात परत आल्याची माहिती मिळाली आहे. या सर्वाची आरोग्य तपासणी केली असून त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. तरीही दक्षतेसाठी त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही घरात विलगीकरण करण्याचा सल्ला दिला असून त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.दरम्यान, निजामुद्दीन येथील ‘तबलिगी जमात’साठी गेलेल्या ‘तबलिगीं’नी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत स्वता:हून पुढे येत माहिती द्यावी तसेच आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन केलेले असतानाही अजूनही या लोकांचा शोध लागत नाही.

शिवसेनेकडून चौकशीची मागणी
निजामुद्दीन येथे ‘तबलीग जमात’साठी कोल्हापुरातून गेलेल्या मुस्लिमांचा नेमका आकडा समजत नसून पोलिसांच्या शोध मोहिमेनंतर यांची संख्या वाढत असल्याने या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हाधिकारी देसाई यांना याबाबत एक निवेदन दिले आहे. ‘तबलीग जमात’साठी गेलेल्या मुस्लिमांचा चुकीचा आकडा सांगणार्‍या लोकांवर कारवाई करण्याची मागणी यामध्ये केली आहे. परप्रांतीय मुस्लिमांची माहिती मुस्लीम बोर्डिगने लपवून ठेवल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.