‘या’ कारणामुळे दादरमधील मुलीला गमवावा लागला जीव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दादर पोलीस वसाहतीत लागलेल्या आगीत एका मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना रविवारी घडली होती. यामध्ये श्रावणी चव्हाण या १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास दादर पोलीस करत आहेत. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. श्रावणी हिने अभ्यास करावा म्हणून तिच्या पालकांनी तिला घरात कोंडून बाहेरून कडी लावून लग्न समारंभासाठी गेले होते. त्यामुळे आग लागल्यानंतर श्रावणीला घरा बाहेर पडता न आल्याने तिचा होरपळून मृत्यू झाल्याचे दादर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, श्रावणी चव्हाणचे आई-वडील एका लग्नसमारंभासाठी जाण्यासाठी रविवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास निघाले होते. आपण गेल्यानंतर श्रावणीने घरात बसून अभ्यास करावा यासाठी त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर आगीची घटना घडली आणि त्यामध्ये श्रावणीचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

श्रावणी चव्हाणचे आई-वडील निघून गेल्यानंतर काही वेळातच घरातून धूर येऊ लागला. त्यामुळे तिच्या शेजारी राहणाऱ्यांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाला या ठिकाणी श्रावणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. तसेच घरामध्ये एक प्लॅस्टिकची बाटली मिळाली असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

त्यामुळे ही आग लावण्यात आली कि घातपाताने लागली या दोन्ही शक्यता पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत. श्रावणीच्या आई-वडीलांचा जाब लवकरच घेण्यात येणार आहे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात अग्निशमन दलाचा अहवालाचीही विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे