PM मोदींच्या महत्वाकांक्षी ‘आयुष्यमान भारत’ योजनेत मोठा घोटाळा, गुजरातमध्ये एकाच कुटूंबाला दिले 1700 ‘कार्ड’

नवी दिल्ली – वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आयुष्यमान भारत’ पंतप्रधान जनआरोग्य योजनेत मोठा घोटाळा समोर आला असून या योजनेतंर्गत २ लाखांहून अधिक कार्ड बनावट असण्याचं उघड झालं आहे. गुजरातमध्ये एकाच कुटुंबात तब्बल १७०० आयुष्यमान भारत कार्ड सापडली आहेत. एवढेच नव्हे तर छत्तीसगडमध्ये एकाच कुटुंबातील ५७ जणांनी या योजनेतून डोळ्यांची सर्जरी केल्याचे उघडकीस आले आहे. अश्या अनेक प्रकरणांचा खुलासा झाला असून सध्या हे प्रकरण पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे पोहचले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अधिक तपास झाला तर मोठ्या प्रमाणात घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आयुष्यमान भारत योजनेतंर्गत गरिब रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिला जातो, ज्याचा खर्च सरकारकडून केला जातो. मात्र या योजनेचा उपयोग चुकीच्या पद्धतीने होत असून देशभरातून २ लाखांपेक्षा अधिक आयुष्यमान भारत योजनेची बनावट कार्ड असल्याचं आढळ आहे. ही बनावट कार्ड बनविण्याचे सर्वाधिक प्रकार उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तराखंड आणि झारखंडमधून समोर आलेत.

गुजरातमधील हॉस्पिटलमध्ये एकाच कुटुंबाच्या नावावर १७०० बनावट कार्ड आहेत. तसेच छत्तीसगडच्या एएसजी रुग्णालयात एका कुटुंबाच्या नावावर १०९ बनावट कार्ड असून यामधील ५७ जणांनी उपचाराचा फायदादेखील घेतला आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये दोन कुटुबांच्या नावावर २०० कार्ड बनविण्यात आले आहेत. मध्यप्रदेशातही एका कुटुबांच्या नावावर ३२२ बनावट कार्ड आहेत.

एका अधिकाऱ्याने दिलेल्यामाहितीनुसार, राजकोटच्या एका सरकारी शाळेत शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यात अनेकांना बनावट कार्ड वाटप करण्यात आलं, प्रत्येक व्यक्तीकडून ७०० रुपये शुल्क घेण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेतलं आहे. आरोग्य समितीचे अध्यक्ष जैमीन ठकर यांनी घटनास्थळी दाखल होत पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. दरम्यान, सप्टेंबर २०१८ मध्ये केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात झाली, या योजनेतून आतापर्यंत ७० लाख लोकांनी उपचार घेतले. त्यासाठी सरकारने ४ हजार ५९२ कोटी रुपये खर्च केले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/