अर्णब गोस्वामींसह अन्य दोघांवर 1914 पानांचे दोषारोपपत्र दाखल; 16 डिसेंबर रोजी होणार सुनावणी

पोलिसनामा ऑनलाईन/रायगड – ‘रिपब्लिक भारत’ टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी सारडा व शेख यांच्या विरोधातील पुनर्निरीक्षण अर्जावरील निर्णय जिल्हा सत्र न्यायालय आज देण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयाने आता 19 डिसेंबर 2020 तारीख दिलीय.

‘रिपब्लिक भारत’ टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह नितेश सारडा व फिरोज शेख यांच्या विरोधात सुमारे 1 हजार 914 पानांचे दोषारोपपत्र रायगड पोलिसांनी शुक्रवारी दाखल केले होते. त्यावर 16 डिसेंबर 2020 रोजी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी होणाराय.

नितेश सारडा व फिरोज शेख यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अगोदर दाखल केलेला जामिन अर्ज शनिवारी मागे घेतला. तसेच याच न्यायालयातील पुनर्निरीक्षण अर्जावरील निकालासाठी 19 डिसेंबर 2020 तारीख दिलीय, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. भूषण साळवी यांनी लोकमतशी बोलताना दिली.

प्रसिध्द वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्तेचा ठपका गोस्वामी, सारडा व शेख यांच्यावर ठेवला आहे. रायगड पोलिसांनी सुमारे एक हजार 914 पानांचे दोषारोपपत्र अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये शुक्रवारी दाखल केले होते.

अन्वय नाईक यांनी गोस्वामी, सारडा व शेख या आरोपींचे वास्तुसजावटीचे काम केले होते आणि केलेल्या कामाची रक्कम आरोपींनी नाईक यांना दिली नाही. त्यामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. नाईक यांना आत्महत्या करण्यास आरोपींनीच प्रवृत्त केल्याचे दोषारोपपत्रामध्ये पोलिसांनी नमूद केले आहे, असेही अ‍ॅड.साळवी यांनी स्पष्ट केले.