‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्‍यांचा मृत्यू !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे मुंबई पालिकेच्या विविध विभागांतील सुमारे पाच हजार कर्मचारी आतापर्यंत बाधित झाले आहेत. त्यापैकी 200 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पालिकेच्या आरोग्य विभागासह विविध विभागांतील सर्वाधिक कर्मचारी बाधित झाले आहेत. ही संख्या सतत वाढतच असून मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांची संख्याही वाढत आहे. डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार यांच्याबरोबरच अधिकारी, अभियंते, विविध विभागातील कर्मचारी, शिपाई यांना देखील करोनाशी संबंधित कामे देण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यांत पालिकेच्या विवध विभागातील कर्मचारी बाधित झाले आतापर्यंत 200 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याची माहिती आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत 134 कर्मचार्‍यांचा बळी कोरोनाने घेतला होता. तर 15 दिवसातच ही संख्या 200 वर गेली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत कोविड 19 शी सामना करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांचा 50 लाखांचा विमा काढण्यात आला आहे. त्याअंतर्गत नुकसान भरपाईसाठी पालिकेने कर्मचार्‍यांसाठी अर्ज केले आहेत.