नरोदा पाटिया दंगल : माया कोडनानी निर्दोष, बाबू बजरंगीची शिक्षा कायम

अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरात उच्च न्यायालयाने नरोदा पाटिया दंगल प्रकरणी मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने माजी मंत्री माया कोडनानी यांना निर्दोष ठरवत सुटका केली. बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

याशिवाय उच्च न्यायालायने हरीश छारा आणि सुरेश लांगडालाही दोषी ठरवले आहे. अहमदाबादच्या विशेष एसआयटी न्यायालयाने बाबू बजरंगीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

काय होती नरोदा पाटिया दंगल?
साबरमती एक्सप्रेस 26 फेब्रुवारी, 2002 रोजी गोध्रा स्टेशनवर पोहोचली असता, अयोध्याहून परतलेले 57 कारसेवक असलेल्या बोगीत आग लावली होती. यानंतर संपूर्ण गुजरातमधील वातावरण बिघडले. गुजरातमध्ये दंगली भडकल्या. याच साखळीत 28 फेब्रुवारी, 2002 रोजी अहमदाबादच्या नरोदा पाटियामध्ये दंगल भडकली, यात 97 लोकांची हत्या करण्यात आली होती.

नरोदा पाटिया हत्याकांड प्रकरणात तत्कालीन मोदी सरकारमधील माजी मंत्री आणि नरोदाच्या आमदार माया कोडनानी, बजरंग दलचे माजी नेते बाबू बजरंगी, स्थानिक भाजप नेते बिपिन पांचाळ, किशन कोरानी, अशोक सिंधी आणि वकील राजू चौमाल यांच्यासह 61 आरोपी बनवण्यात आले होते.

नरोदा पाटिया हत्याकांड प्रकरणाची कारवाई ऑगस्ट 2009 मध्ये सुरु झाली होती. यात 62 आरोपींविरोधात आरोप दाखल करण्यात आले. यात सुनावणी दरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला होता.