IIT प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या मुंबईकर तरुणाला गुगलमध्ये नोकरी ; वर्षाला १.२ कोटींचे पॅकेज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत राहणारा एक २१ वर्षीय तरुण आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झाला होता. यानंतर त्याने अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले यानंतर त्याला आता गुगलमध्ये नोकरी मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे गुगलने त्याला वर्षाचे १.२ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. सप्टेंबरपासून तो गुगलमध्ये रुजू होणार आाहे. अब्दुल्ला खान असं या तरुणाचं नाव आहे. अपयशाला भीक न घातल्याने त्याने यशाला गवसणी घातली आहे.

अब्दुल्ला खान याला आयआयटीत जायचे होते परंतु आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत मात्र तो अनुत्तीर्ण झाला. तो अपयशाने खचला नाही. त्याने मीरा रोड येथील श्री एल. आर. तिवारी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याला गुगलकडून ई-मेल आला. प्रॉग्रेमिंग साइटवर प्रोफाइल पाहून मला गुगलने मेल पाठवला होता, असे अब्दुल्ला सांगतो. आपल्या यशाबद्दल बोलताना अब्दुल्ला म्हणाला की, “मी एका स्पर्धेत सहभागी झालो होतो. गुगलसारख्या मोठ्या कंपन्या या स्पर्धेतील प्रॉग्रेमरच्या प्रोफाइलवर लक्ष ठेवत असेल, असे मला कधीच वाटले नव्हते” एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. इतकेच नाही तर, “मी गुगलसोबत काम करण्यास उत्सुक आहे, हा अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे” असे त्याने आवर्जून सांगितले आहे.

अब्दुल्ला खान याची ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली. यानंतर गुगलने त्याची निवड केली. त्याला तब्बल १.२ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले. सप्टेंबरमध्ये अब्दुल्ला गुगलच्या लंडन येथील कार्यालयात रूजू होणार आहे. अब्दुल्लाचे बारावीपर्यंत शिक्षण सौदी अरेबियात झाले असून बारावीनंतर तो भारतात परतला. १२ वीनंतरचे शिक्षण त्याने मुंबईतून घेतले आणि एका मोठ्या यशाला त्याने गवसणी घातली.