आघाडीची सुपारी फुटली ; प्रत्येकी २४ जागांवर लढणार दोन्ही काँग्रेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा लोकसभा निवडणुकीचा जागा वाटपाचा अंतिम निर्णय झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात झालेल्या बैठकीत आघाडी बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही काँग्रेसने २४-२४ जागांवर लढण्याचे ठरवले असून आघाडी बाबतची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

काँग्रेसच्या सुकाणू समितीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने आघाडीची सुपारी आता तुटली आहे असे म्हणायला वाव मिळतो आहे. काँग्रेसला राष्ट्रवादीला २४ जागा द्यायच्या नव्हत्या तर स्वतः २६ जागा लढवून राष्ट्रवादीला २२ जागी लढवण्याची काँग्रेसची मनीषा होती. परंतु मुसद्दी शरद पवारांनी आपला मनसुबा काँग्रेसच्या कंठातून उतरवून घेतला आहे. काँग्रेसला शरद पवारांसारखा वजनदार नेता सोडून जाण्याची रीक्स कदापी घ्यायची नाही म्हणून राहुल गांधी यांनी महाराष्ट्र्रात जागा वाटपाचे सर्वाधिकार शरद पवार यांना स्वाधीन केले होते. या संर्दभात शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात मागच्या दोन आठवड्यात चार बैठका पार पडल्या आहेत.

दिल्लीच्या थंडीत राजकारणाची गरमी, विरोधी पक्षांच्या नेत्यांची पार पडली बैठक
आगामी निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येण्याचे ठरवले आहे. भाजपच्या विजयाच्या रथाला चांगल्या प्रकारे कसे रोखायचे या संदर्भात बातचीत करण्यासाठी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची काल दिल्लीत एक बैठक पार पडली या बैठकीत प्रफुल पटेल, सुप्रिया सुळेंसह काँग्रेसचे अहमद पटेल, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, माकपचे नेते सीताराम येचुरी, बसपाचे सतीश मिश्रा, सपाचे राम गोपाल यादव, जया बच्चन, तृणमूलचे डेरेक ओब्रायन, भाकपचे डी. राजा, द्रमुकच्या मिसा भारती इत्यादी नेते उपस्थित होते.

भाजपच्या विरोधात पुरोगामी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असलेल्या मुद्द्यावर एकमत झाले असले तरी महाआघाडी करण्यास सर्वच पक्षांच्या नेत्यांनी होकार भरला नाही.

काँग्रेस आघाडी वापरणार भाजपचा फॉर्मुला
प्रकाश आंबेडकरांच्या भारिप, माकप, शेकाप,आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या सोबत आघाडी करण्यास शरद पवार उत्सुक असून या पक्षांच्या सोबत आघाडी करण्यासाठी संबधित पक्षांच्या नेत्या सोबत आता बोलणी सुरु केली जाणार आहे. मात्र इतर पक्षांसोबत आघाडी झाली तर त्यांना या २४-२४ च्या कोठ्यातूनच जागा दिल्या जाणार असल्याच्या बाबीवर हि दोन्ही काँग्रेसने एकमत केले आहे. तर अशाच पध्द्तीचा फॉर्मुला सेना भाजप युतीने गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी वापरला होता.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी आघाडीच्या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी अधिकृत घोषणा होणे बाकी असल्याचे म्हणले आहे. मात्र २४-२४ जागांवर आघाडी होणार असल्याचे त्यांनी हि माध्यमांच्या प्रतिनिधींच्या सोबत केलेल्या बातचितीमध्ये म्हणले आहे.