मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर झुंडबळीच्या घटनेवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणे आणि वैयक्तिक पातळीवर टिकाटिप्पणी करणे, तसेच सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याकडून होत असल्याचा आरोप राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केला आहे. गोस्वामी यांच्याविरोधात राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राज्यातील प्रमुख नेत्यांनी केली आहे. बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्यांची व्हिडिओ कॅन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ही मागणी करण्यात आली.
सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्या अर्णब गोस्वामी व त्यांच्या रिपब्लिक भारत या वृत्त वाहिनीवर कारवाई करण्याची विनंती आम्ही संयुक्तरीत्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करत आहोत. pic.twitter.com/Cr4X5HVbdC
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 22, 2020
पालघरमधील प्रकरणाचा आम्ही निषेध करतो. ही अत्यंत दुख:द घटना आणि अमानविय कृत्य आहे. मात्र या घटनेत कोणताही धार्मिक विद्वेषाचा दृष्टीकोन नाही, असे असतानाही काही माध्यमे व राजकीय व्यक्ती या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे गंभीर आहे. कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रासह देशातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे बुधवारी रात्री स्पष्ट केले.
बंधुभावाचा संदेश देणाऱ्या आपल्या देशात सामाजिक विद्वेष पसरविणे कदापि मान्य होणार नाही. देशाच्या एकतेसाठी ते घातक राहील. त्यामुळे आम्ही संयुक्तरीत्या सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्या अर्णब गोस्वामी आणि संबंधित वृत्तवाहिनीवर कारवाई करावी, अशी मागणी या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्र सरकारकडे केली आहे. काँग्रेसचे महासचिव मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकिस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, खासदार राजीव सातव, कुमार केतकर, बाळू धानोरकर, काँग्रेसचे मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते.