कल्याण : लग्नासाठी निघालेल्या वाहनावर काळाचा घाला; 3 जणांचा मृत्यू, दोघे जखमी

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नासाठी निघालेल्या वाहनाचा अपघात झाल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणगाव शनी मंदिर परिसरात गुरुवारी (दि. 18) दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. भरधाव कार रसत्याच्या कडेला उभा असेल्या ट्रकला धडकून जात असतानाच पाठीमागून आलेल्या भरधाव बसने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोघा जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मयूरी चौरे (वय 18) हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिची आई वैशाली (41) आणि भाऊ सागर (22 सर्व रा.बालाजी आर्केड सोसायटी, विजयनगर, कल्याण पूर्व) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयूरीचे वडील पंडित चौरे (47) आणि चालक संजय बागुल (42) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात जखमी झालेले पंडित चौरे हे मुंबईतील पोलीस दलात कार्यरत आहेत. कारचालक बागुल हे देखील पोलीस कर्मचारी असून ते कल्याणमध्ये कार्यरत आहेत. मयूरी ही डोंबिवलीतील पेंढारकर महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकत होती तर सागर हा कळव्यातील एका खासगी कंपनीत इंजिनिअर पदावर कार्यरत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व भागातील आर्केड सोसायटीत राहणारे चौरे कुटुंब जळगावला लग्नासाठी कारने निघाले होते. आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्याजवळ सिमेंटचे पोते भरलेला ट्रक बिघडल्याने रस्त्यात बंद पडला होता. दरम्यान कारचालक बागूल यांना उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज आला नाही. कार थेट उभ्या ट्रकला घासून बाजूला जाताच पाठीमागून आलेल्या भरधाव बसने कारला जोरदार धडक बसली. यात कार थेट बाजूच्या खड्ड्यात जाऊन उलटली. या भीषण अपघातात कारमधील मयूरीचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वैशाली यांचा गुरुवारी रात्री उशिरा तर सागरचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.