प्रेम प्रकरणातून तरुणाचा सपासप वार करून खून

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे प्रेम प्रकरणातून एका ३२ वर्षाच्या तरूणाचा खून केल्याची घटना घडली आहे. अकिल खान असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. ही घटना आर्णीच्या ड्रीम लँड सिटी परिसरात घडली असून घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीचे घर जाळले. त्यामुळे या परिसरात तणावाची परिस्थीती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकिलचे परिसरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही बाब तरुणीच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी अकिल याला धमकावण्यास सुरुवात केली. रविवारी रात्री अकिल याला बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी मंदा रामटेके, सतीश जमदाळे आणि नितीन कदम यांनी अकिलसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

दरम्यान, अकिलने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगितला. त्याचे मित्र येईपर्यंत अकिल आणि आरोपींमध्ये वाद सुरु होते. अकिलच्या मित्रांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेल्या आरोपीपैकी एकाने अकिलवर चाकूने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अकिलला मित्रांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. संतप्त झालेल्या जमावाने आरोपीचे घर जाळले. त्यामुळे या परिसरात तणाव निर्णाण झाला. ही घटना समजता पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करू आग विझवली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.