…मग आडवा बंधारा म्हणून अमित शहाला बसवणार का नदीत ?

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुलवामातील शहीद जवान हे राजकीय बळी आहेत तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कसून चौकशी करा, सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी कोल्हापूरातील एका कार्यक्रमात केला. पाकिस्तानचं पाणी रोखण्याचा इशारा देणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाकिस्तानचं पाणी बंद करणार आहेत. मग आडवा बंधारा म्हणून अमित शहाला नदीत बसवणार आहात का असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला.

शहीद झालेले जवान हे राजकीय बळी-

निवडणुकीदरम्यान काहीतरी मोठं घडवलं जाणार, असं भाकित वर्तवताना राज ठाकरे म्हणाले की ,’निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुलवामाचा हल्ला घडवून आणला आहे. त्यामुळे या हल्ल्यात शहीद झालेले जवान हे राजकीय बळी ठरले आहेत. एखादी घटना लपवायची असेल तर काहीतरी मोठी बातमी आणायची, हे सगळ्या सरकारांमध्ये चालत आलंय. पण या सरकारमध्ये त्यात प्रचंड वाढ झालीय. बातम्या पसरवल्या जाताहेत, पेरल्या जात आहेत. त्यामुळे नोटाबंदी, राफेल आणि भ्रष्टाचाराची अन्य प्रकरणं जनतेने विसरावीत, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा मध्यात सरकारकडून काहीतरी मोठं घडवलं जाईल, अशी शंका राज यांनी व्यक्त केली.

अजित डोवाल यांची आधी कसून चौकशी करा –

भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी करण्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. सरकारच्या या सर्व निर्णयांमागे सल्लागार असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची आधी चौकशी करा, सर्व सत्य बाहेर येईल अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
“आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या दोन गट पडले आहेत. हे काय प्रकरण होतं, काय प्रकरण घडलंय? राफेल विसरावं, नोटाबंदीत झालेला गैरव्यवहार विसरावा यासाठी हे सुरु आहे”, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

आडवा बंधारा म्हणून अमित शहाला बसवणार आहात का –

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचं पाणी रोखण्याचा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. यावर पाकिस्तानचं पाणी तोडायला नळातून पाणी देणार आहात का असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय कायदा वगैरे काही असतो की नाही? दोन-तीन देशातून जाणारं पाणी एक देश थांबवू शकतो का? पाकिस्तानचं पाणी बंद करणार आहेत. मग आडवा बंधारा म्हणून अमित शहाला बसवणार आहात का नदीत असा प्रश्नहीpp त्यांनी विचारला.
पाकिस्तानचे पाणी रोखण्याच्या सरकारच्या भुमिकेवर भाष्य करताना पाकिस्तानला जाणारे पाणी अडवायचे तर नदीत अमित शाह आडवे झोपले आहेत, असे व्यंगचित्रही आपण काढणार असल्याचा खोचक टोलाही यावेळी त्यांनी लगावला.