महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्युने ४०० प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांचा रस्त्यावर राडा

लोदीपूर (बिहार) : वृत्तसंस्था – डेंग्यु झाला असतानाही महिला पोलीस कर्मचाऱ्याला सुट्टी नाकारुन रस्त्यावर वाहतूक नियोजनाचे काम दिले. त्यात तिचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या ४०० प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ घातला. त्यात बहुसंख्य महिला होत्या. पोलीस लाईन बाहेर कित्येक तास हा गोंधळ सुरु होता.

याबाबतची माहिती अशी, सविता पाठक या तीन दिवसांपासून तापाने फणफणत होत्या. असे असताना डीएसपींनी तिला सुट्टी देण्यास नकार दिला. इतकेच नाही तर या परिस्थितीत तिला कारगील चौकावर वाहतूक व्यवस्था सांभाळण्याची जबाबवारी सोपविण्यात आली. सविताला बुधवारी सकाळी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हे समजताच  संतापलेल्या प्रशिक्षणार्थींनी डीएसपी मोहम्मद मसहलुद्दीन यांना मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर घटनास्थळी दाखल झालेले ग्रामीण एसपी, शहर एसपी तसेच डीसीपींशी वाद घालत त्यांच्याशीही गैरवर्तवणूक केली.

बुद्धा कॉलनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोदीपूर येथे झालेल्या हिंसाचारात डीएसपी, अनेक अधिकारी जखमी झाले. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की, एसएसपी मनु महाराज यांनीदेखील जवळपास ४० मिनिटे घटनास्थळाला भेट देणे टाळले. हिंसाचार सुरु होताच परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी व सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार करत प्रशिक्षणार्थीना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस वाहनांची तोडफोड करत होते. त्यांनी काही कार्यालयांचीही तोडफोड केली. कॉम्प्लेक्सच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी काही दुकानांमध्येही तोडफोड करण्यास सुरुवात केली.

जवळच असणाऱ्या एका मंदिरातील सीसीटीव्हीची तोडफोड करत त्याची हार्ड ड्राइव्ह घेऊन जाण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरु होता. पण स्थानिकांनी त्यांच्यावर विटा आणि दगड फेकण्यास सुरुवात केली. यानंतर प्रशिक्षणार्थींनी देखील दगडफेक केली. यामध्ये एकूण १० जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी डीजीपी के एस त्रिवेदी यांना पुढील तीन दिवसांत घटनेचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

डीजीपी के एस त्रिवेदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार, अद्याप सर्वांना प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही. अशाप्रकारे बेशिस्त आणि हिंसक आंदोलन करण्यासाठी त्यांना कदाचित कोणीतरी भडकवलं असावं. त्रिवेदी यांनी डीआयजी राजेश कुमार यांनी हिंसाचाराची चौकशी करण्यास सांगितलं आहे.

जाहिरात