Coronavirus Impact : पंढरपुरात तब्बल 400 वर्षांची परंपरा ‘खंडीत’, चैत्र वारीचा सोहळा ‘रद्द’ !

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या हैदोसामुळे पंढरपुरात तब्बल 400 वर्षांची परंपरा असलेल्या चैत्र वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. चैत्री वारीचा सोहळा कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रद्द करण्यात आला आहे. पंढरपुरात भरणार्‍या चार प्रमुख वार्‍या पैकी असलेली चैत्री वारीच्या येत्या 4 एप्रिलला संपन्न होणार होता. मात्र, कोरोना व्हायरसच्या जीवघेण्या सावटामुळे चैत्रीचा हा सोहळा रद्द करण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय आद्य हभप देवव्रत महाराज वासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराज मंडळीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी…वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र असला तरी देशावरील आलेले कोरोणाचे संकट भयंकर आहे. लॉकडाउन निर्णयाला साथ देण्यासाठी चैत्री वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वारीची परंपरा खंडीत होते आहे, हे कारण काढून कोणीही पंढरपूरला येण्याचा अट्टाहास करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. चैत्री वारीला तीन ते चार लाख वारकरी भाविकांची पंढरपुरात उपस्थिती असते. वारी रद्द केल्याने कोरोनाला लगाम बसणार आहे. वारीला चारशे वर्षाची परंपरा आहे.

वारी रद्द होण्याचा पहिलाच प्रसंग आहे. वारीची परंपरा स्थानिक महाराज मंडळी रुढीनुसार पार पाडतील. जे नियमाचे वारकरी आहेत. त्यांना आपल्या घरातच व्रतवैकल्य करुन विठ्ठलरखुमाईचे पूजन करावे, पंढरपूरला येण्याचा अट्टाहास करुन नये. कोरोनामुळे सध्याविठ्ठल मंदिर बंद आहे. तेव्हा वारकर्‍यांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन तमाम वारकरी मंडळींना केले आहे.