शहीद जवानांच्या परिवाराला सरकारकडून ५ एकर जमीन

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – स्वतःच्या जिवाची तसेच कुटुंबीयांची पर्वा न करता जवान दिवसरात्र सीमेवर रक्षण करत असतात , त्यातील काही देशसेवेचं कर्तव्य बजावताना शहीद होतात. अशा शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराच्या मदतीसाठी राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांना राज्य सरकार ५ एकर मोफत  जमीन देणार आहे.
राज्य सरकारने २८ जून २०१८ रोजी महाराष्ट्रातील शहीदांच्या परिवाराला ५ एकर शेतीयोग्य जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. नांदेड जिल्हा प्रशासनाने याची अंमलबजावणी केली आहे. सरकारने  शहीद संभाजी कदम यांच्या परिवाराला ५  एकर शेतीयोग्य सरकारी जमीन मोफत दिली आहे. काश्मीर येथे सीमेवर तैनात असताना संभाजी कदम शहीद झाले होते. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. घरातला कमावता मुलगा गेल्याने कुटुंब कस काय उदरनिर्वाह करणार असा प्रश्न होता. ‘सरकारच्या या योजनेमुळे आपल्याला ५ एकर जमीन मिळाल्याने आता परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही या जमिनीवर शेती करू’, असे वीरपत्नी शीतल संभाजी कदम यांनी सांगितले.  राज्य सरकारने नांदेड जिल्ह्यातील खरबी गावात  शेतीयोग्य सरकारी जमीन कदम यांच्या कुटुंबियांना दिली आहे.