पुलवामा दहशतवादी हल्ला : मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर मोदी सरकारने तातडीची बैठक बोलवत यावर ५ महत्त्वाचे मोठे निर्णय घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीत संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हे उपस्थित होते.

मोदी सरकारने घेतलेले ५ मोठे निर्णय

१. पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा भारताने काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. १९९६ पासून पाकिस्तानला भारताकडून व्यापारात सूट मिळत होती ती सूट आता बंद होणार आहे.

२. गृहमंत्री राजनाथ सिंह शनिवारी सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत राजनाथ सिंह पुलवामा हल्ल्याबाबत सर्व पक्षांसोबत विस्ताराने चर्चा करणार आहेत.

३. परराष्ट्र मंत्रालय आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी सगळ्या देशांसोबत चर्चा करणार आहे. जगासमोर पाकिस्तानला खरा चेहरा आणण्यासाठी भारत पाऊल उचलणार आहे.

४. १९८६ मध्ये भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाची परिभाषा बदलण्याचा प्रस्ताव दिला होता. आता हा प्रस्ताव पास करण्यासाठी आणखी प्रयत्न केला जाणार आहे. हा प्रस्ताव पास करण्यासाठी इतर देशांवर दबाव टाकला जाणार आहे.

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईसाठी भारतीय जवानांना स्वातंत्र्य दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली आहे. आम्ही जवानांना कारवाईसाठी खुली सूट दिली आहे.

बैठकीनंतर आम्हाला जवानांचा अभिमान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची गळचेपी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बैठकीतील सगळेच निर्णय आता सांगता येणार नाहीत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यात ४४ भारतीय जवान शहीद झाले होते. सीआरपीएफच्या या ताफ्यात जवळपास २५०० जवान होते. या घटनेनंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात राग आहे. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्त्यूतर देण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.