जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात 5 तरुणांचा बुडून मृत्यू

जव्हार : पोलीसनामा ऑनलाइन –   धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेली पाच मुलं बुडाल्याची घटना गुरुवारी (दि.2) दुपारी तीनच्या सुमारास घडली. ही घटना जव्हारपासून सात किमी अंतरावर केळीचापाडा (काळशेती) येथील धबधब्यावर घडली. धबधब्याच्या पाण्यात बुडालेले तरुण जव्हारमधील अंबिका चौक येथील आहेत. या घटनेमुळे जव्हार शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जव्हार येथे लॉकडाऊन असल्यामुळे बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे आंबिका चौक येथील 13 मुलं काळमांडवी धबधब्यावर पोहण्यासाठी गेली होती. हा धबधबा खूप मोठा आणि खोल दरीत आहे. येथे पावसाळ्यात खाली उतरणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. या तीन मोठे पाण्याचे डोह आहेत, मात्र यातील काही मुलांना खोलीचा अंदाज न आल्यामुळे डोहात एकाचवेळी पाच मुलं बुडाली.

निमेश पटेल, बाळा फलटणकर, दादू वाघ, प्रथमेश चव्हाण, रिंकू भोईर अशी डोहात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. हे तरूण 18 ते 22 वयोगटातील आहेत. बुडालेल्या पाचही तरुणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघर जिल्हा पालकमंत्री दाद भुसे, आमदार सुनील भुसारा यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास जव्हारचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे करीत आहेत.