निपाणीजवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा ठार

कागल (कोल्हापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-बेंगळरू राष्ट्रीय महामार्गावर स्तवनिधी (तवंदी) घाटात कार आणि ट्रकच्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले. सायंकाळी साडेचार वाजता हा अपघात घडला. सर्व मृत कागल तालुक्यातील मुरगूड येथील आहेत. प्राथमिक माहितीनुसार एका बालकासह चार पुरुष आणि एका महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.

तवंदी घाटात हॉटेल अमर समोर हा अपघात झाला. बेळगावहून मुंबईकडे जाणार्‍या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटला. ट्रक विरुद्ध बाजूला जाऊन बेळगावकडे निघालेल्या कारवर उलटला. अपघातानंतर सुमारे दोनशे फूट कार फरपटत गेली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. दिलावर जमादार, रेहाना जमादार, जुनेद खान जमादार, आफरिन जमादार आणि आयान जमादार अशी मृतांची नावे आहेत.
मृतदेहांचा चेंदामेंदा झाल्याने ओळख पटण्यास विलंब झाला.

घटनास्थळी बेळगावचे जिल्हा पोलिस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी भेट देऊन पाहणी केली. मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनीही घटनास्थळी भेट दिली. ट्रकमधील जखमींना महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.