मोदी सरकारने 6 वर्षांत काढले 63 अध्यादेश

पोलिसनामा ऑनलाईन – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 63 अध्यादेश काढण्यात आले आहेत. अगदी आवश्यक बाब असेल तेव्हाच अध्यादेशाच्या पर्यायाचा वापर करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार खडसावले असतानाही मोदी सरकारने अध्यादेश काढले आहेत.

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर आतापर्यंत तब्बल 63 अध्यादेश काढण्यात आल्याची माहिती ‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च’ या संस्थेने दिली. मोदी सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर महत्त्वाच्या विषयांवर अध्यादेशाचा मार्ग मोदी सरकारने पत्करला. अगदी आवश्यक असेल तेव्हाच अध्यादेश काढण्यात यावा, असा सल्ला दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मोदी सरकारला दिला होता. सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी अध्यादेशाचा अवलंब करण्याबाबत प्रतिकूल मत व्यक्त केले होते. दरम्यान, 1952 पासून 2014 पर्यंत 637 अध्यादेश काढण्यात आले होते. यात सर्वाधिक 157 अध्यादेश हे इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात काढण्यात आले होते. डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या दहा वर्षांच्या कालावधीत 61 अध्यादेश काढण्यात आले होते.