Relationship : पार्टनरसोबत सतत वाद होत असतील तर हे नक्की वाचा

वृत्तसंस्था – तु्म्ही रिलेशनशिपमध्ये आहात तुमचेही तुमच्या पार्टनरसोबत सतत वाद होतात का? होत असोत किंवा नसोत परंतु तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ज्या कपल्समध्ये  जर रोज वादविवाद, भांडण होत असतील तर अशा कपल्सच्या नात्याचं दीर्घ भविष्य नसतं, असं म्हटलं जातं. सतत वाद घालणारे कपल्स लवकरच विभक्त होतात आणि एकत्र राहिलेच तर ती केवळ एक तडजोड असते. तर दुसरीकडे  ज्या कपल्समध्ये कमी भांडणं होतात, जे नेहमी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात, या लोकांचे नाते दीर्घ काळ टिकून राहतं, असाही समज आहे. नेमकं काय खरं आहे आणि काय खोटं आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
संशोधनकर्त्यांनी एका शोधातून याबाबतचे सत्य काय आहे ते समोर आणले आहे.  संशोधनकर्त्यांनी पाच अशा कपल्सच्या स्वभावाचा अभ्यास केला, जे सतत कोणत्या-न्-कोणत्या कारणांवरुन भांडणच करत असतात. संशोधनकर्त्यांनुसार, जी जोडपी खूप कमी प्रमाणात भांडतात किंवा भांडतच नाहीत, या लोकांच्या तुलनेत जी जोडपी प्रत्येक छोट्या-मोठ्या मुद्यावर वाद घालतात, त्यांच्यामध्ये एकमेकांप्रती प्रचंड प्रेम असतं हे समोर आले आहे. जाणून घेऊयात ते कसे…
1.वेगळेपण स्वीकारा : प्रेमाचा खरा अर्थ असा होतो की सर्व गुण दोषासोबत त्या व्यक्तीचा स्वीकार करणे. बऱ्याचदा तुम्हाला समोरच्या व्यक्तीमध्ये काहीतरी खास गोष्टी दिसतात. त्या तु्म्हाला भावतातदेखील परंतु काही  काळाने ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या होत्या, त्याच बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे प्रेम नसते. ज्या मुद्यांवर तुमचे विचार जुळत नाहीत, त्यावर नक्कीच संवाद घडणं गरजेचं आहे. जेणेकरुन तुमचे वास्तविक विचार नाते जपताना मरणार नाहीत. एकूणच एकमेकांचे वेगळेपण स्वीकारा आणि जपा.
2. प्रश्न निर्माण करा :   जोपर्यंत तुम्ही एकमेकांसमोर प्रश्न निर्माण करत नाहीत, तोपर्यंत तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा तरी विकास होणार नाही.  जर दोघंही एकमेकांच्या गोष्टींबाबत सहमती दर्शवत असतील, तोंडातून निघालेले प्रत्येक वाक्य पूर्ण होत असेल, कोणते प्रश्न निर्माण होत नसतील, तर हे नाते केवळ एक सवय म्हणून आयुष्यात राहील. म्हणून तु्मच्या ज्या काही कमतरता असतील त्या  एकमेकांना सांगा. शिवाय, समजाच तुमच्यातील एखादी कमतरता पार्टनर सांगितली तर वाईट वाटून घेऊन नका. कादाचित या शेअरींगमुळे तुमच्यातील एखादी कमतरता भरून काढताना तु्म्हाला पार्टनरची मदत होईल.
3.आपलं मत मांडा : अनेकजण आपलं नातं टिकावं म्हणून तडजोड करताना दिसतात. काही जण पार्टनरची खटकणारी किंवा न पटणारी गोष्ट सांगताना संकोचतात. नाते तुटेल याची त्यांना भीती वाटते. पण नात्यात खरंच प्रेम आहे का?, हा प्रश्न तुम्हीच स्वतःला विचारा. कारण दोन व्यक्तींमध्ये खरंच प्रेम असेल तर न घाबरता बिनधास्तपणे खटकणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या पाहिजेत.
4. मनात ठेऊ नका, बोलून मोकळे व्हा : जर तु्म्हाला तु्मचे नाते एकदम राईट ट्रॅकवर चालवायचे असेल तर मनात जे आहे, तेच ओठांवरही असू द्यात. मनात जे काही असेल ते बोलून मोकळे व्हा. यानंतर वाद होणार असेल तरीही बोला. उगाचच वरवरचं वागण्यामुळे नात्यात दुरावा वाढण्यापेक्षा बोलून मोकळे झालेले केव्हाही बरं. कारण मनात बऱ्याच गोष्टी साठवून ठेवल्यात तर कदाचित एखादे दिवशी त्याचा ज्वालामुखी होऊन स्फोट होईल. मनातील अशा गोष्टी या कचऱ्यासारख्या असतात. आपण आपल्या घरातील कचरा जसा बाहेर काढतो तसाच नात्यातील कचरा ही साफ केला पाहिजे.
5. यामुळे आत्मविश्वास वाढतो : एक साधं गणित आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या पार्टनरजवळ उघडपणे सांगू शकत नसाल तर तुम्ही आपलीच मते जगासमोर उघडपणे सांगू शकणार नाही. जी कपल्स न घाबरता आपल्या पार्टनरसमोर कोणतीही गोष्ट बेधडक मांडू शकतात. त्याच व्यक्तींमध्ये जगाविरोधातही आपल्या हक्कासाठी लढण्याची हिंमत असते. आणि या गोष्टीचा उपयोग तुम्हाला दैनंदिन जीवन आत्मविश्वासाने जगण्यास फायदा होताे. कारण या गोष्टीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो.