केवळ एका चुकीमुळं 70 लाख शेतकर्‍यांना सोडावं लागलं PM-Kisan च्या 2000 वर पाणी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ साली किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र, एका चुकीमुळे ७० लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता आला नाही. कोणाला अंदाज सुद्धा नसेल की, शब्दांमधल्या एका चुकीमुळे शेतकऱ्याला सहा हजार रुपयांवर पाणी सोडावे लागेल. शेतकऱ्यांना कागदवरील एका चुकीमुळे ४२०० कोटी रुपयांचा सहाय्यता निधी प्राप्त झाला नाही. तसेच जोपर्यंत ती चूक सुधारत नाही, तोपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.

काय झाली चूक?

पंतप्रधान किसान योजनेच्या अर्जदारांच्या बँक आणि खाते क्रमांकात थोडा गोंधळ आहे. बँक खाती व इतर कागदपत्रांमध्ये नावाची स्पेलिंग वेगवेगळी असल्याने अनेक शेतकऱ्यांना या योजनेपासून मुकावे लागले आहे. यासंदर्भात किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हटलं की, ‘अशा प्रकारची गडबड करणारे अर्जदार शेतकऱ्यांची संख्या सुमारे ७० लाखांच्या आसपास आहे. तर जवळपास ६० लाख लोकांच्या आधार कार्डमध्ये गोंधळ आहे.

प्रलंबित सव्वा कोटी प्रकरणे

देशातील सुमारे १.३ कोटी शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. तसेच देशभरातील असेही काही जिल्हे आहेत, जिथे सव्वा-सव्वा लाख शेतकऱ्यांची डेटा पडताळणीसाठी प्रलंबित प्रकरणे आहेत. जेव्हा राज्य सरकार शेतकऱ्यांच्या तपशीलाची पडताळणी करुन ते केंद्राकडे पाठवते, तेव्हा शेतकऱ्याला पैसे मिळतात.

चूक दुरुस्त करण्यासाठी काय करावे?

सर्वात आधी पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या. त्याच्या फार्मर कॉर्नरवर जा आणि तिथे Edit Aadhaar Details या पर्यायावर क्लिक करा. येथे आपल्याला आपला आधार क्रमांक प्रविष्ट कराव लागणार आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. आपले नाव केवळ चुकीचे वाटल्यास म्हणजेच आपले नाव अप्लिकेशन आणि आधारवर भिन्न असल्यास ते ऑनलाइन माध्यमातून दुरुस्त करुन घ्या. बाकीच्या चुकांसाठी आपल्या लेखापाल व कृषी विभाग कार्यलयाशी संपर्क साधा.