देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान पार्क म्हणून हिंजवडीची ओळख आहे. हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय कंपन्या या ठिकाणी कार्य़रत आहेत. या ठिकाणी दैनंदीन कामकाजासाठी सुमारे २ लाख नागरीक येत असतात. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. आणि त्यामुळे या ठिकाणी कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा वेळ वाया जातो. या सर्व पार्श्वभूमिवर हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रोचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
दरम्यान या कार्यक्रमावेळी बोलताना मोदी म्हणाले की, “मागील दोन वर्षात डिजीटल क्षेत्रात अमूलाग्र क्रांती झाली. देशात 500 किमीपर्यंत मेट्रोचं जाळं पसरवण्यात आलं असून देशात आणखी 300 किमीचे मेट्रो मार्ग तयार होणार आहेत इतकेच नाही तर महाराष्ट्रातील 8 शहरं स्मार्ट करणार आहोत. याशिवाय 4 वर्षात डझनभर शहरात मेट्रोचा विस्तार झाला आहे. ”इतकेच नाही तर आपण केलेल्या विकास कामाचा पाढा वाचून दाखवताना ते म्हणाले की, “2014 पूर्वी डिजीटल व्यवहारांचे जे प्रमाण होते त्यात 2014 नंतर तब्बल 6 पटीने वाढ झाली आहे.
डिजीटल इंडिया आणि मेक इन इंडियाने सरकारच्या प्रयत्नांना गती दिली. शिवाय आम्ही 1 लाख 25 ग्रामपंचायत वायफाय युक्त,1 लाख 50 हजार पोस्ट ऑफिस डिजिटल आणि आधुनिक केले तसेच 700 रेल्वे स्टेशनवर वायफाय बसवले. मुख्य म्हणजे महाराष्ट्रात 1 लाख पथदिवे लावण्याचं कामही आम्ही केलं.”