अंत्ययात्रेवर वीज पडून 9 जणांचा मृत्यू

कानपुर : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी अंत्ययात्रा पुलावरून जात असताना पूल कोसळल्याची घटना घडली होती. उत्तर प्रदेशातील हरदोईच्या मंसुरपूर येथे एका व्यक्तीची अंत्ययात्रा चालली असताना अचानक वीज कोसळली आणि एकच हाहाकार माजला. वीज कोसळून अंत्ययात्रेतील ९ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंसुरपूर गावाचे सरपंच सुशील अवस्थी यांचा मुलगा सौरभ अवस्थीचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. शुक्रवारी सौरभचा मृतदेह अंत्यविधीसाठी कुसुमखोर घाटाकडे नेत असताना वाटेतच अचानक अंत्ययात्रेवर वीज कोसळली. वीज पडून अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या 9 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.