९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू होते. यासोबतच हे संमेलन नाशिकमध्ये की उत्सामानाबादमध्ये होणार याचा देखील गोंधळ चालू होता. अखेर हे संमेलन उस्मानाबाद येथे होणार असल्याची घोषणा नुकतिच भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे एकूण चार प्रस्ताव आले होते यामध्ये लातूर, बुलढाणा, नाशिक आणि उस्मानाबाद असे चार प्रस्ताव समोर असताना अखेर उस्मानाबाद हे नाव निश्चित करण्यात आले. पहाणीनंतर उस्मानाबादची घोषणा करण्यात आली.

येत्या जानेवारी महिन्यामध्ये या साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन कधी होणार हे अजून समजले नाही पण साहित्य प्रेमी यांच्याशी बोलून लवकरच याची तारीख निश्चित करु, असे देखील ठाले-पाटील यांनी सांगितले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याला संमेलन आयोजनाचा सन्मान मिळावा याकरिता मराठवाडा साहित्य परिषदेच्या मागणीला बळ देणारा ठराव आपण घेतला असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली होती.

उस्मानाबाद शाखेने साहित्य महामंडळाकडे मराठवाडा साहित्य परिषदेने आजवर केलेल्या एकूण तयारीच्या अनुषंगाने यजमानपद मिळावे यासाठी मागणी केली होती. या मागणीचा उस्मानाबाद नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठरावही करण्यात आला होता. साहित्य महामंडळाने या मागणीची दखल घेऊन संमेलनासाठी उस्मानाबादची निवड केली आहे.