चोरीचा आरोप झाल्यानं 12 वर्षाच्या सूरजला ‘नैराश्य’, पुढं उचललं ‘असं’ पाऊल की कोणी विचारच करू शकत नाही

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – घराच्या शेजारी असलेल्या दुकानातून 50 रुपये चोरल्याचा महिलेने केलेल्या आरोपाने नैराश्य आल्याने 12 वर्षाच्या मुलाने मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबाद येथे उघडकीस आली. सूरज जनार्दन क्षीरसागर (वय-12) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सुजने रेल्वेसमोर उडी घेत आपले आयुष्य संपवले. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुरज हा शिवाजीनगर येथील कलावती चव्हाण शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. आनंदनगर येथील घराशेजारी सरला धुमाळ यांचे दुकान आहे. गुरुवारी (दि.17) सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुरज हा त्याची बहीण श्रद्धासह (वय-9) शाळेत गेला होता. त्यावेळी सरला शाळेत आल्या आणि त्यांनी सूरजबाबत विचारणा केली. आपल्या दुकानाच्या गल्ल्यातून त्याने पन्नास रुपये चोरल्याचा आरोप त्यांनी केला. ही बाब कळताच संवेदनशील मन असलेला सूरज शाळेतून निघून गेला. सरला यांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो सापडला नाही.

दरम्यान, सरला यांनी सुरजच्या वडिलांना फोन करून सांगितले. सुरजचे वडील हे सरला यांना त्यांच्या दुकानात भेटण्यासाठी गेले त्यावळी सुरज दुकानात आला होता. त्यानेच गल्ल्यातील पन्नास रुपये चोरल्याचा आरोप सरला यांनी केला. त्यानंतर सुरजच्या नातेवाईकांनी त्याचा दिवसभर शोध घेतला मात्र सापडला नाही. त्यानंतर रात्री त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला. या प्रकरणी मृत सुरजच्या वडिलांच्या तक्रारीवरून पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात सरला धुमाळ या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.