‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईत ठाकरे सरकारचं ‘मोठं’ पाऊल, मुंबईसह ‘या’ 7 जिल्ह्यात मिळणार ‘ही’ सुविधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्य सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. यासाठी ‘टेलीआयसीयू’ सुविधेचा वापर केला आहे. मुंबई, ठाणे, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, अकोला आणि जालना या 7 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात उपचार सुरु असलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे 75 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. 10 ते 15 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. मात्र, सुमारे तीन टक्के रुग्ण जे गंभीर आहेत, त्यांना अतिदक्षता विभागात उपचार आवश्यक आहेत. अशा रुग्णांवर उपचार करताना आयसीयूमधील जे विशेषज्ज्ञ आहेत त्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. मात्र, मेडीस्कोप या डॉक्टरांच्या फाऊंडेशनमार्फत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत ‘टेलीआयसीयू’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रस्ताव फाऊंडेशनने दिला आहे.

या फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील काही आयसीयुंचे व्यवस्थापन केले जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. यासाठी आयसीयुमधील प्रत्येक बेडला लावलेल्या मॉनीटरवरील रुग्णाच्या वैद्यकीय स्थीतीचे नियंत्रण ‘टेलीआयसीयू’ मार्फत केले जाईल. या सेवेच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर रुग्णाची स्थिती पाहून उपचाराचा सल्ला देणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. सध्या सत जिल्ह्यात ही सेवा प्रायोगिक तत्वावर उपलब्ध केली असून यात यश आल्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यात देखील अशी सुविधा सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.