पिंपरी : ‘त्या’ 27 रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात किमान १५ वर्षे वास्तव्य असलेल्यांना राज्यातील नोकरी तसेच रिक्षा व अन्य परमीट मिळण्यास ते पात्र होतात. असे असताना बनावट रहिवासी दाखला सादर करुन ते खरे असल्याची भासवून रिक्षा बॅच प्राप्त केले, अशा २७ रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक परिवहन अधिकारी सुबोध शिवाजीराव मेडसीकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

हा प्रकार १९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात घडला. महम्मद अली हबीब अली सय्यद (रा. ओटा स्कीम, रुपीनगर, निगडी), शिवाजी शंकर डोलारे (रा. भोंडवे वस्ती, रावेत, देहुरोड), मुबारक महेबुब शेख (रा. राहुलनगर, ओटास्कीम, निगडी), व इतर २४ अशा २७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी शासनाची फसवणुक करण्याचे हेतूने अ‍ॅटो रिक्षा बॅचसाठी लागणारे कागदपत्रामध्ये बनावट रहिवाशी दाखले (स्थानिक वास्तव्याचे दाखले) सादर केले. ते खरे आहेत, असे भासवून उप प्रादेशिक परिवहन कार्यालात दाखल करुन शासनाची फसवणुक करुन अ‍ॅटो रिक्षा बॅच प्राप्त केले आहे.

शासनाने नवीन अ‍ॅटो रिक्षा बॅच देण्यासाठी योजना आखली होती. शासनाच्या नियमानुसार महाराष्ट्रात किमान १५ वर्षे स्थानिक वास्तव्याचे दाखला असणे आवश्यक असते. अशावेळी परराज्यातून आलेले तसेच इतर ठिकाणाहून आलेल्यांकडे गेली १५ वर्षे ते राज्यात रहात आहेत, अशी कोणतीही कागदपत्रे नसल्यास ते एजंटच्या मार्फत अशी बनावट कागदपत्रे तयार करुन घेतात व ती सादर करुन अ‍ॅटो रिक्षा बॅच मिळविला जातो.

आता परिवहन कार्यालयाने सादर केलेली कागदपत्रांची खरेपणा तपासण्यास सुरुवात केल्यानंतर या २७ जणांनी बनावट दाखले तयार करुन ते सादर केल्याचे आढळून आले. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखीही काही जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.