…. अन् काळाने घातला पती-पत्नीवर घाला

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातत्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. संसार फुलायला सुरुवात झाली असताना दोघांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना शुक्रवारी (दि.18) घडली आहे. चालत्या दुचाकीवर वीज पडून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

ब्रह्मपुरी शहराजवळील प्रभूकृपा राईस मिल जवळची ही घटना असून पारडगाव येथील पिंन्टु राऊत (वय-30) व त्याची पत्नी गुंजन राऊत (वय-27) आज ब्रह्मपुरी शहरात काही कामानिमित्त आले होते. त्यानंतर हे दाम्पत्य आपलं काम आटपून गावाकडे परत जात होते. मात्र, वाटेतच वीजांचा कडकडाटासह पाऊस पडत असताना प्रभूकृपा राईस मिल जवळ त्यांच्या दुचाकीवर वीज कोसळली. या घटनेत हे दोघेही पती-पत्नी जागीच ठार झाले. राऊत दाम्पत्याच्या निधनानंतर त्यांची 8 महिन्यांची मुलगी पोरकी झाली आहे. एका क्षणात राऊत कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, पावसाळा सुरु झाल्यापासून वीज पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. यामुळे पावसाचं वातावरण असताना शक्य असेल तर घरातच थांबून जीव वाचवणे गरजेचे आहे. चंद्रपुरमध्ये घडलेल्या या घटनेवरुन तरी हेच अधोरेखित झालं आहे.