‘त्या’ रिसॉर्टच्या जलतरणतलावात बुडून ७ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रिसॉर्टमधील जलतरणतलावात बुडून एका सात वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. ही घटना विरारच्या अर्नाळा येथील सागर रिसॉर्टमध्ये घडली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून या ठिकाणी जीवरक्षक नसल्याने पर्यटककांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आफिया शेख असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी परिसरात राहणारा २१ जणांचा एक ग्रुप आज सकाळी सागर रिसॉर्टमध्ये आला होता. सकाळी नाश्ता करून काहीजण रिसॉर्टमधल्या जलतरणतलावात पोहण्यासाठी उतरले होते. यामध्ये अब्दुल शेख हे त्यांच्या पत्नीसह आणि सात वर्षाची आफिया ही पाण्यात उतरले. काहीवेळाने अब्दुल शेख पाणी पिण्यासाठी बाहेर आले.

त्यांच्यामागे त्यांची पत्नीही पाण्याबाहेर आली. मात्र, आफिया पाण्यात होती. आफिया पाण्यात बुडत असताना इतर पर्य़टकांनी पाहिले. काही पर्यटकांनी पाण्यात उडीमारुन आफियाला पाण्याबाहेर काढले. तिला तात्काळ खासगी रुग्णालायत उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

दरम्यान, सागर रिसॉर्टमध्ये असलेल्या जलतरणतलावाच्या ठिकाणी जीवरक्षक तैनात करण्यात आले नव्हते. जीवरक्षक असते तर आफियाचा जीव वाचला असता अशी चर्चा घटनास्थळी होती. तपासानंतर पोलिसांनी रिसॉर्ट चालकावर गुन्हा दाखल केला जाईल असे अर्नाळा सागरी पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.