चला हवा येऊ द्याच्या टीम ला आगरी दणका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील एका व्यक्तिरेखेमुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे आगरी-कोळी भूमिपुत्र संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या टीमने आगरी-कोळी समाजाची जाहीर माफी मागावी असे त्यांनी कार्यक्रमाच्या टीमला सांगितले आहे.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या ५ आणि ६ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्यात आलेल्या दिवाळी पहाटमध्ये विविध गायक, कवी अशी पात्रे प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. त्यात आगरी कवी मिथुन भोईर उर्फ अधोक्षज भोईरचे एक विनोदी पात्र दाखवण्यात आले होते. हे नाव आगारी समाजात अत्यंत अभावाने आढळत असल्याचे अ‍ॅड. भारद्वाज लक्ष्मण चौधरी यांनी पत्र लिहून सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, आगरी पात्राद्वारे तुम्ही विनोदाची निर्मिती केल्यास आम्हाला काहीही हरकत नाही. पण कोणत्याही कार्यक्रमाद्वारे आगरी समाजावर टीका करण्यास कोणालाही अधिकार नाही. आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने बजावले आहे की, आमच्या समाजाचा अपमान केल्याप्रकरणी या कार्यक्रमाच्या टीमने माफी मागावी.

आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने कार्यक्रमाच्या निर्मात्यांना लेखी पत्र लिहून याबाबत कळवले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, आगरी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल सात दिवसांत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अथवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असा इशारा या संघटनेने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना दिला आहे. या पत्रानंतर भाऊ कदम यांनी आगरी समाजाची जाहीर माफी मागत असल्याचे जाहीर केले आहे.