शेतकऱ्यांचे कोट्यवधी बुडवणाऱ्या अभिजित देशमुखला पुण्यातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित उत्तमराव देशमुख (वय-३९) यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडविल्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. अभिजित देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला होता. अभिजित देशमुख हे महाराष्ट्र शेतकरी शुगर कारखान्याचे चेअरमन असून त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २ कोटी ५ लाख २५ हजार ९८५ रुपये दिले नसल्याबाबत २०१६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता

नांदेड सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मागावर होते. अखेर पथकला ते पुण्यात असल्याची माहिती मिळाली. पथकाने रविवारी रात्री पुण्यात येऊन अटक केली. अभिजत देशमुख यांना लवकरच नांदेड येथे नेण्यात येणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे

सन २०१४ साली मुदखेड तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचा महाराष्ट्र शेतकरी शुगर साखर कारखान्याने हजारो टन ऊस खरेदी केला होता. न्याहाळी गावातील गोविंद संभाजी गोपनपल्ले यांनी पहिल्यादा ७० टन ऊस दिला होता. यानंतर ६७ शेतकऱ्यांनी तीन हजार टन उस दिला. मात्र कारखान्याचे चेअरम अभिजीत देशमुख यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले. त्यामुळे गोविंद गोपनपल्ले यांनी ८ जुलै २०१६ रोजी मुदखेड पोलीस ठाण्यात देशमुख यांच्या विरुद्ध फिर्य़ाद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी देशमुख आणि इतर व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.