…अन् CM होण्याची इच्छा नसतानाही दबावामुळे जबाबदारी स्वीकारली; नितीश कुमारांचा खुलासा

पटणाः पोलीसनामा ऑनलाईन – नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपला मित्र कोण होता आणि शत्रू कोण हे कळले नाही?, असे मोठे विधान करत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती परंतु दबावामुळे मी जबाबदारी स्वीकारली आहे, असे विधान केल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यातच एनडीएचे सहकारी जीतनराम मांझी यांनी आपले राजकीय रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. परिणामी एनडीएतील धूसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे एनडीएमध्ये सर्वकाही आलबेल आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारची स्थापना होऊन 2 महिने उलटले तरी आतापर्यंत कॅबिनेटचा विस्तार आणि विधान परिषदेच्या जागेचा फॉर्म्युलाही ठरला नाही. असे असतानाच एनडीएमधील धूसफूस समोर येत आहे. जेडीयू प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत नितीश कुमार म्हणाले की, निवडणुकीत माझे लोक कमी जिंकले तेव्हा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती. पण मुख्यमंत्री जेडीयू आणि भाजपामुळे झालो आहे. एनडीएमध्ये 5 महिन्यापूर्वी सर्वकाही चर्चा व्हायला हवी होती. कोरोनामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. ज्याचा फटका जेडीयूला बसला.

बिहार विधानसभा निवडणुकीत यावेळी जेडीयूच्या जागा भाजपापेक्षा कमी आल्या. भाजपाला 74 तर जेडीयूला 43 जागा मिळाल्या. एनडीएत भाजपाची मोठ्या भावाची भूमिका नितीश कुमारांना पटली नाही. माजी मंत्री जेडीयू नेता जयकुमार सिंह यावेळी भाजपातून एलजेपीत आलेले उमेदवार राजेंद्र सिंह यांच्यामुळे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. नितीश कुमार यांच्या निकटचे मानले जाणारे अभय कुशवाहा यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. राजकारणात मुरब्बी असलेले नितीश कुमार यांच्याकडून कुठे चूक झाली आणि त्यांचे राजकीय गणित बदलून गेले. परंतु नितीश कुमार आता पुन्हा पक्षाच्या वाढीसाठी कामाला लागले आहेत.

फोडाफोडीची राजकारण सुरु
बिहारमध्ये जनतेने यंदा असा जनादेश दिला आहे की, एनडीए आणि महाआघाडी यांच्यात बहुमतासाठी खूपच कमी अंतर आहे. एनडीएकडे 125 तर महाआघाडीकडे 110 आमदारांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय एमआयएम 5 बसपा 1 आणि अपक्ष आमदार आहे. त्यामुळे बिहारमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. जेडीयूचे 17 आमदार आरजेडीमध्ये सहभागी होतील असा दावा केला जात आहे. तर काँग्रेसचेही 11 आमदार एनडीएत जाऊ शकतात अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.