रेशन आणण्यासाठी जाताना कारचा भीषण अपघात, 3 ठार तर 5 जण गंभीर जखमी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – रेशन आणण्यासाठी निघालेल्या नागरिकांच्या गाडीला झालेल्या भिषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जावळी तालुक्यातील मेरुलिंग मेढा या घाटात आज (रविवार) सकाळी पवणे आठच्यासुमारास हा अपघात झाला. इंडिका कार चालकाचे मेरुलिंग घाटातील एका अवघड वळणावर ताबा सुटल्याने कार खोल दरीत कोसळली. अपघातामध्ये गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. अशी माहिती समोर येत आहे की, रेशनिंग आणण्यासाठी जात असताना मेरुलिंग घाटात एका वळणाचा अंदाज न आल्याने गाडी पलटी झाली, यातच ही दुर्घटना घडली. यामध्ये इंडिका कार चालक शिवाजी जगन्नाथ साबळेसह (वय-40), लिलाबाई गणपत साबळे (वय-55), सागर सर्जेराव साबळे (वय-32) यांचा मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली आहे.

या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मेढा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रेशन आणण्यासाठी जाताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.