बलात्कारप्रकरणी आसाराम दोषी, दोघांची निर्दोष मुक्तता!

जोधपूर: वृत्तसंस्था

जोधपूरमधील कारागृहात असलेल्या आसाराम अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरला आहे. या संदर्भातील जोधपूर SC आणि ST न्यायालयाने निर्णय दिला.आसारामसह शरद आणि शिल्पी या तिघांना दोषी ठरविण्यात आले असून प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले.

एकूण पाच आरोपींबाबत न्यायालयाने निर्णय
पोलिसांनी 6 नोव्हेंबर 2013 रोजी आसाराम आणि त्याचे सहकारी शिवा, शिल्पी, शरद आणि प्रकाश यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. आसारामविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत, अल्पवयीन न्याय आणि आयपीसीच्या अन्य कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा निकाल येण्यापूर्वीपासून दिल्ली ते जोधपूरपर्यंतच्या सुरक्षेत वाढ केली आहे. जोधपूरला छावणीचे स्वरुप आले आहे. राम रहीमचा निकालानंतर ज्याप्रकारे त्याच्या अनुयायांनी दिल्लीसह अनेक ठिकाणी हैदोस घातला, तशीच परिस्थिती या वेळीही होण्याची शंका पोलिसांना आहे. आसाराम दोषी ठरल्यास त्याचे समर्थक गोंधळ घालू शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती.

पीडितेने केलेल्या आरोपानुसार, “जोधपूरच्या एक फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने 15 आणि 16 ऑगस्ट 2013 या दिवशी रात्री उपचाराच्या बहाण्याने लैंगिक शोषण केले होते.” दिल्लीच्या कमलानगर पोलिस स्टेशनमध्ये 19 ऑगस्ट 2013 रोजी आसारामविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हे आहेत आसारामवरील गुन्हे
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. दिल्लीच्या कमलानगर मार्केट पोलिस स्टेशनमध्ये आसारामविरुद्ध शून्य नंबरचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर तो जोधपूरमध्ये स्थलांतरीत करण्यात आला. आसाराम बापूवर भारतीय दंडविधान कलम 342, 376, 354-अ, 506, 509/34, जेजे अॅक्ट 23 आणि पोक्सो कायद्याच्या कलम आठ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या नंतर जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूला इंदूरमधून 31 ऑगस्ट 2013 रोजी अटक केली होती. तेव्हापासून आसाराम बापू जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहे.

कसा चालला खटला?
जोधपूर सत्र न्यायालयात आसारामविरुद्धचा खटला सुरु होता. कोर्टाने आरोप निश्चित केले. आरोपपत्रात 58 साक्षीदार सादर करण्यात आले. तर सरकारी वकिलांनी 44 साक्षीदारांनी जबाब नोंदवला. 11 एप्रिल 2014 पासून 21 एप्रिल 2014 दरम्यान पीडित मुलीचा 12 पानांचा जबाब नोंदवला. 4 ऑक्टोबर 2016 रोजी आरोपी आसारामचा जबाब नोंदवण्यात आला. 22 नोव्हेंबर 2016 पासून 11 ऑक्टोबर 2017 पर्यंत बचाव पक्षाने 31 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सोबतच 225 दस्तऐवज जारी केले. एससी-एसटी कोर्टात 7 एप्रिलला युक्तिवाद पूर्ण झाला आणि कोर्टाने निकाल सुनावण्यासाठी 25 एप्रिलची तारीख निश्चित केली.

आसारामावरील गुन्ह्यांची यादी मोठी
या प्रकरणात न्यायालयाने आसाराम बापूला निर्दोष ठरवले असले तरी तरी तो तुरुंगातून सुटला नसता. कारण त्याच्याविरोधात गुजरातमध्येही बलात्काराचा खटला सुरु आहे.

दिल्लीपासून राजस्थानपर्यंत अलर्ट
निकालानंतर दिल्लीपासून राजस्थानपर्यंत कोणतीही आणीबाणीची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी दोन्ही राज्यांच्या सरकारने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दिल्ली पोलिस पूर्णत: अलर्ट आहे. तर जोधपूरमध्येही कलम 144 लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत कुठेही लोकांचा जमाव दिसला की, कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसातील अधिकारी उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिसांशी संपर्कात आहेत. पोलिसांनी लोकल इंटेलिजन्सद्वारे आसारामचे आश्रम आणि त्याच्या समर्थकांच्या हालचालींवर नजर ठेवली आहे.

अनुयायांकडून पूजा-कीर्तन सुरु
दिल्ली-एनसीआरमधील आसाराम बापूच्या आश्रमांमध्ये त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा होत आहेत. यामध्ये महिला, वयोवद्ध आणि मुलांचाही समावेश आहे. आसारामला न्यायालयाकडून न्याय मिळेल, असे या अनुयायांचे म्हणणे आहे. आश्रमांमध्ये त्याच्या सुटकेसाठी कीर्तन आणि पूजा सुरू आहे.