‘या’ आजारांना कारणीभूत होऊ शकते अपचन आणि बद्धकोष्ठता

पोलीसनामा ऑनलाईन टीम – उत्तम आरोग्यासाठी व शरीरक्रिया सुस्थितीत चालण्यासाठी घेतलेला आहार हा रोजच्या रोज पचन होऊन मलस्वरूपात बाहेर पडणे गरजेचे असते. परंतु बर्‍याच कारणांमुळे मलत्याग रोजच्या रोज होत नाही किंवा मलप्रवृत्ती अधिक बद्ध स्वरूपात व कुंथून करावी लागते या लक्षणांनाच मलावष्टंभ/ मलावरोध/ बद्धकोष्ठता म्हटले जाते. मलावष्टंभ हा स्वतंत्र आजार नाही, परंतु बर्‍याच आजारांची पार्श्‍वभूमी तयार करण्यासाठी कारणीभूत ठरतो. यामुळे सुरुवातीला मलावष्टंभ हा जरी किरकोळ वाटत असला तरी जास्त काळ राहिल्यास त्याची परिणती अनेक पचनाच्या किंवा इतर विकारांत होऊ शकते.

आयुर्वेदानुसार अपान वायू हा आतड्यांच्या सुयोग्य हालचाली घडवून पचलेला आहार पुढे ढकलून मलप्रवृत्ती होण्यास कारणीभूत असतो. परंतु खाली वर्णन केलेल्या कारणांमुळ अपान वायू हा रुक्ष गुणाने प्रकुपित होऊन चल गुणाच्या कमतरतेमुळे आतड्यांच्या हालचाली योग्य होत नाहीत तसेच वाताच्या रुक्षत्वाने जलियांश शोषला जाउन मल शुष्क व पिच्छिल होतो असा मल आतड्यांना चिकटून बसतो व मलप्रवृत्ती सकष्ट, अधिक बद्ध स्वरुपात व कुंथुन होते.अशाप्रकारे योग्य मलप्रवृत्ती न झाल्याने कुंथुन मलप्रवृत्ती करावी लागणे, पोट जड वाटणे व फुगून येणे अशी लक्षणे दिसायला लागतात. सोबतच गॅसेस, नाभी खालच्या पोटाच्या भागात जडपणा वाटणे, भुक मंदावणे, कुठल्याही कामात उत्साह नसणे, उदरशुल, चिड-चिडेपणा, डोके दुखणे, मळमळ-उलटी, अनिद्रा अशी अनेक लक्षणे मलावष्टंभामुळे शरीरावर दिसून येतात. व खुप काळ मलावष्टंभ राहील्यास त्याची परीणती पुढे मुळव्याध, भगंदर, हर्निया, ग्रहनी (कइर), कोलायटीस, शिरशुल, जुनाट सर्दी अशा अनेक आजारांमधे होऊ शकते.