‘अर्णब गोस्वामींवरील कारवाई म्हणजे अन्वय नाईक यांना न्याय’

मुंबई: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात दोन वर्ष देवेंद्र फडणवीस सरकारने कारवाई न करता नाईक कुटुंबावर अन्याय केला. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असेल तर अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाई योग्यच आहे. नाईक कुटुंबाला कोणाच्या दबावाखाली धमकावून प्रकरण दाबले गेले त्या पोलीस अधिकाऱ्यावर आता कारवाई केली पाहिजे अशी मागणी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

ते म्हणले, अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी व इतर दोघांची नावे होती, असे असतानाही दोन वर्षात या प्रकरणावर फडणवीस सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. नाईक कुटुंब हे दोन वर्षापासून न्यायासाठी संघर्ष करत आहे. परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. या प्रकरणात गोस्वामी यांचे स्टेटमेंट अलिबागला नाही तर मुंबईत एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात नोंदवण्यात आले. एवढी स्पेशल ट्रिटमेंट कशासाठी दिली गेली. पीडित कुटुंबाला चौकशी अधिकाऱ्याने घाबरवण्याचा प्रयत्न केला. पॉवरफुल लोक अर्णबच्या मागे आहेत असे सांगण्यात आले, ते लोक कोण आहेत? ते आज केंद्रीय गृहमंत्र्यांपासून इतर नेत्यांची विधाने पाहता स्पष्ट झाले आहे. याची उत्तरे तत्कालीन मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पाहिजेत.

अर्णब गोस्वामींच्या अटकेवरुन भाजपा जो आकांडतांडव करत आहे ते अत्यंत चुकीचे आहे. देशाचे गृहमंत्री म्हणून प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देणे ही अमित शहा यांची जबाबदारी आहे. परंतू ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना हे प्रकरण दाबले आणि आज दोन वर्ष न्यायासाठी ज्यांनी संघर्ष केला त्यांना न्याय मिळतो आहे असे असताना गोस्वामीची बाजू घेणे हे दुर्दैवी आहे. दोन वर्ष एका मृत व्यक्तीच्या परिवाराला न्याय न मिळणे हे लोकशाहीसाठी लज्जास्पद आहे. एक मराठी परिवार उद्धवस्त होत असताना महाराष्ट्रातील भाजपाचे नेते अर्णब गोस्वामींच्या मागे जात असतील तर ते महाराष्ट्राच्या जनतेला सहन होणारे नाही. असेही सावंत यांनी म्हंटले आहे.