शरद पवारांच्या ह्दयावरील जखम कार्यकर्त्यांनी भरून काढावी, जितेंद्र आव्हाडांचे आवाहन

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विकास कशाला म्हणतात हे मला माहीत नाही, परंतु दुसऱ्याने केलेली कामे आपल्या नावावर कशी खपवायची हे जर शिकायचे असेल तर भाजप नेते आमदार गणेश नाईकांकडे जाऊन शिका, असा टोला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

नवी मुंबई येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या रविवारी (दि.17) वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या बैठकीत आव्हाड बोलत होते. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संतोष शेट्टी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, निरीक्षक प्रशांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आव्हाड म्हणाले की, मी गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणार असल्याचे ओळखले होते आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना याबाबत कल्पना दिली होती, परंतु त्यांच्यावर पवारांचा प्रचंड विश्वास होता. काही काळातच नाईक यांनी राष्ट्रवादी सोडली. ही जखम पवार यांच्या हृदयावर आजही आहे. ही जखम भरून काढण्याचे काम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे असे आवाहन आव्हाड यांनी केले. प्रत्येक सभेला शरद पवार यांच्याशेजारी नाईक बसायचे, परंतु भाजपच्या पहिल्याच सभेत त्यांना खाली जागा मिळाली नाही. त्याचं वाईट वाटत असल्याचे सांगत त्यांच्यात स्वाभिमान उरलेला नसल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकासाच्या चहू बाजू उघडून टाकल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून भूमिपुत्रांचे पुन्हा एकदा सीमांकन केले जाईल, गरजेपोटी बांधलेली घरे अधिकृत करून गावठाणाला मिळणारा चार एफएसआय देण्यात येईल, असे आश्वासन देत असल्याचे आव्हाड म्हणाले.

गणेश नाईक यांच्याकडे मंत्रिपद असताना त्यांना हे प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यांची एकूण वाटचाल बघता ते वैराग्याकडे वाटचाल करतात असा टोला आव्हाड यांनी लगावला. गेल्या 25 वर्षांत यांना भूमिपुत्रांवरील अन्याय दूर करता आला नाही त्यामुळे त्यांना दूर करण्याची वेळ आली असल्याचे सांगत महाविकास आघाडीचा महापौर बसविण्याचे आवाहन खासदार राजन विचारे यांनी केले.

ससून डॉक नवी मुंबईत आणावा
नौसेनेची हद्द येत असल्याने मुंबईतील ससून डॉक बंद करावा, अशी त्यांनी सूचना केली आहे. मुंबईतील ससून डॉक नवी मुंबईत आणावा आणि यामध्ये येथील आगरी कोळी भूमिपुत्रांना प्रथम स्थान द्यावे, अशी मागणी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केली. ऐरोलीजवळ मोठी जागा आहे. खाडीची खोली चांगली असेल आणि त्याठिकाणी मोठ्या बोटी येऊ शकत असतील तर ससून डॉक ऐरोली येथे आणावा, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री अस्लम शेख यांनी सदर मागणी रास्त असून, लवकरच याबाबतीत सकारात्मक कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.